मातृभूमी, मातृदेवी (सरस्वती) व मातृभाषा यांचे महत्त्व
`या तिन्ही देवता सुख देणार्या आहेत. त्यांची महती फार असल्यामुळे त्यांनी समृद्धतेने आमच्या ठिकाणी वास्तव्य करावे. भूमी, सभ्यता व वाणी यांच्याद्वारे मानवाची संस्कृती आणि मानवता दिसून येते. `त्यांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्य करत रहावे', असे सांगितले आहे; म्हणूनच क्षात्रधर्माचे यशोगान केले आहे.
अ. मातृभूमी : ही आपले भरण-पोषण करून आपल्याला समृद्ध करते. आपली मातृभूमी नेहमी स्वतंत्र पाहिजे. त्यामुळेच मानव आपला विकास साधू शकतो. आपली मातृभूमी मिळवून आज इस्त्रायल राष्ट्र थोड्याच काळात आपल्या बुद्धीकौशल्याने व प्रयत्नाने प्रगत झाले आहे.
आ. मातृदेवी (सरस्वती) : वरील समजून घेण्यासाठी व तिकडे लक्ष लागण्यासाठी सरस्वतीदेवीची कृपा पाहिजे; म्हणून तिची आराधना केली पाहिजे. ती आपल्याला या जगताचे गूढत्व सहज रीतीने सांगते व आपली बुद्धी निर्मल करून मेधाशक्ती जागृत करते.' - प.पू. परशराम माधव पांडे महाराज (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ३७-३८)
इ. मातृभाषा : मातृभाषेद्वारे मिळालेल्या ज्ञानाद्वारे माणसाला जग, समाज व राष्ट्र्र यांचे ज्ञान मिळते. ऋषीमुनींनी दिलेल्या अमृतमय ज्ञानाला घेऊन `मी कोण, कशा रीतीने दीर्घायुष्य घालवले पाहिजे व त्याचा उपयोग कसा समर्थतेने करून घ्यावयास पाहिजे', हे समजून घ्यावे. यामुळे तो स्वत: समृद्ध होऊन समाज व राष्ट्र्र यांना समर्थ होण्यास हातभार लावू शकतो आणि आपले जीवन आनंदात घालवू शकतो. माणसाला आईकडून मातृभाषा सहज मिळालेली असते. तो आपले विचार व मनन मातृभाषेत चांगल्या रीतीने करून आपली प्रगती करू शकतो. भाषा एकात्मभाव व जवळीकता साधण्यास मदत करते.
No comments:
Post a Comment